Friday, February 20, 2015

                              कोवळ्या कळ्यांचे कत्तलखाने सर्रास सुरु.....
 
   अहमदनगर जिल्हा नेहमी या ना त्या कारणाने कुप्रसिध्द चर्चेचा धनी राहिला आहे. वाळु उपश्यातुन गोळीबार असो, जीतीय तनाव असो, महिलावरील अत्याचार असो, गटातटातील वाद असो किंवा दलित अत्याचार असो अशा अनेक घटनांनी जिल्ह्याची कुप्रसिध्दी झाली आहे यात शंकाच नाही. जिल्ह्याचे नाव जरी सरळ अन कानामात्रा नसलेले असे तरी येथिल राजकिय आणि गुन्हेगारी मुळे बदनामीची काळिमा जिल्ह्याच्या माथी राहिलीच आहे. त्यात आता गेल्या वर्षभरापासून गर्भलिंग निदान समिती व जिल्हा प्रशासनाची पकड ढिली झाल्याने गर्भातील कोवळ्या कळ्यांचे लचके तोडणारे पांढरपेशे पुन्हा सक्रिय झाले आहेत. पोलिसांच्या क्राईम मॅन्युअलमध्ये हे गुन्हे जरी समाविष्ट नसले तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कळ्या खुडणाऱ्यांचा नवा बेल्ट तयार होत असून, मानवी रक्त-मासाचे हे कत्तलखाने बंद करण्याची नैतिक जबाबदारी पोलिस, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे स्वीकारणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयातील पांढ-यापेशांना पोलीसांनी गजाआड केले आहे तर अनेकांना न्यायालयाने शिक्षा ही ठोठावल्या आहे.   
                                  एका हॉस्पिटलमध्ये साधारण महिन्याभरापूर्वी एक गोंडस "चिऊ'ने जन्म घेतला. बाळाच्या आवाजाने बाळंतीण महिलेची आई व सासूबाईंच्या चेहऱ्यावर भल्या पहाटे आनंदाचा उजेड पसरला. दोन-तीन तासांच्या अंतराने बाळंतीणीला ऑपरेशन थिएटरबाहेर आणण्यात आले, तेव्हा ती बेशुद्धच होती. एवढ्यात महिला डॉक्‍टरही बाहेर आले व दोन्ही आजींना सांगितले, "भेटू शकता तुम्ही...' नातवासाठी टक लावून बसलेल्या या आजी बाळंतीणीजवळ पोचल्या अन्‌ मुलीचा जन्म झाल्याचे त्यांना कळले. तसा दोन्ही आजीबाईंनी दवाखाना अक्षरशः डोक्‍यावरच घेतला. "असं कसं व्हयीनं, आम्हाले अमुक डॉक्‍टरने सांगलय... पोरगाच व्हईन म्हणून... ही दुसऱ्या कोनाची पोरगी अशीन, मले नको ती पोरं..' अवघ्या दोन-तीन तासांपूर्वीच जन्म घेतलेली मुलगी घेण्यास या आजीबाईने नकार देत येथील महिला डॉक्‍टरांशी वाद घातला. साधारण परिस्थिती असलेल्या या आजीबाई स्वतः एक स्त्री असताना केवळ वंशाला दिवाच हवा असा हट्ट करीत राहिल्या.  ही परिस्थिती फक्त जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात आहे.

जिल्ह्यात छुप्या पद्धतीने अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी सर्रास सुरू असल्याचे या आधीच अनेक घटनेतून स्पष्ट झाले. अनेक डॉक्टरांना राजकीय दृष्ट्याही पॉवरफुल ताकत मिळत असल्याने त्यांचे फावत आहे. अनेक खाजगी रुग्णालयात गुपचूप गर्भलिंगनिदान सुरूच आहे. शहरी भागात कारवाईला सुरवात झाली, की तालुक्‍यातील ग्रमिण भागातील डॉक्‍टरांची दुकानदारी जोरात सुरू होते. सोनोग्राफीच्या चालत्या-फिरत्या दुकानांवर मध्यरात्री व पहाटेच्या सुमारासही मोठी गर्दी जमते. पेढा असला तर सर्वकाही आनंदात सरते. मात्र जिलेबी, बर्फी असली की सोय लागते ती गर्भपाताची... सोनोग्राफी करणारा डॉक्‍टरच मग पत्ते काढून देतो या कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या"कसायांचे'. जिल्ह्यातच काय तर अशावेळी जरा लांबच्या तालुक्‍यात किंवा शेजारील जिल्ह्यात ही या गर्भवतीलापाठवण्यात येते.                                                                                                                            
जिल्हात कारवाईच्या घटना सुरू असतील, तर मगही मंडळी चान्स घेत नाही. घरातील एखाद्याचा जीव वाचवला, चांगले उपचार केले म्हणून डॉक्‍टरांच्या पायावर लोटांगण घालणारा आमचा समाज आहे. डॉक्‍टरांना देव म्हटले जाते. मात्र हाच देव केव्हा दानव झाला, हेच कळायला मार्ग नाही. गर्भात असलेल्या जिने अजून बाहेर जगाचे कुठलेच नुकसान केलेले नाही, साधी नजरही तिची या जगावर पडलेली नाही, माणसाच्या वाट्याचा एक श्‍वासदेखील तिने अजून स्वतः घेतला नाही, अशा जिवाची कत्तल घडवून आणणारे हे प्रशिक्षित "दानव' गडगंज माया यातून जमवत आहेत.                                                                    खून झाला तर पोलिसात त्याची गंभीर दखल घेत न्यायव्यवस्था त्यास फाशीपर्यंतची शिक्षा ठोठावते. महिला, मुलींच्या गुन्ह्यात पोलिस यंत्रणा जातीने लक्ष घालून तत्काळ कारवाई करते. मात्र, कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या कसायांना आवर घालण्यात यश येत नसेल, तर याला काय म्हणावे. नुकतेच गर्भपाताचे कत्तलखाने चालवणाऱ्या डॉक्‍टरांना शिक्षाही झालेल्या आहेत. असे असताना या महाभयंकर "सोशल क्राईम'कडे पोलिस, जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही, हीदेखील "सोशल क्राईम'ला पाठबळ देणारीच बाब नाही काय?...
........
सुनिल दवंगे 




No comments:

Post a Comment